रण - दुर्ग
मिलिन्द बोकीलांच्या दोन दीर्घकथा आहेत. कादंबरी असा उल्लेख का केला असावा, कळले नाही.
दोन्ही कथांच्या नायिका एमएसडब्ल्यू करून एनजीओत काम करणार्या आहेत.
दोन्ही दीर्घकथा एका पातळीपर्यंत पोचतात, विचार करायला प्रवृत्त करतात, त्यापलीकडे ज्या उंचीवर जातील याची अपेक्षा असते, तिथवर पोचत नाहीत.
रण कथेत नमिताने नागेशला घटस्फोट दिलेला आहे, मुलाला घेऊन एकटी राहते. घटस्फोटानंतर भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले असताना, कच्छच्या रणात दोघे भेटतात.
त्याला वाटतं, घटस्फोटाचं कारण ’तो पूर्वी दारू प्यायचा, सिगरेटी ओढायचा, हे आहे." विचारपूर्वक ते तो बंद करतो. त्याची नमिताबरोबर पुन्हा एकत्र राहण्याची इच्छा आहे. नमिता म्हणते तेच एक महत्त्वाचे कारण नाही, तो तसा छानच आहे, सभ्य , मनमिळाऊ, हसतमुख, पोलिटिकली अगदी करेक्ट, कुणालाही वाटेल काय मस्त माणूस आहे! ... आतून अगदी पोकळ . त्याच्याबरोबर एकत्र राहतो त्या प्रत्येक क्षणीच कळतं ते!"
या बिंदूपासून कथा उतरत जाते. नमिताला काय म्हणायचं आहे ते नीट स्पष्ट होत नाही, ती ते शोधायलाच जात नाही. तिला हा माणूस असा आहे हे कळतं, ती आतल्या आवाजाला ओ देते, गुंते सोडवत नाही. म्हणजे एका गुहेच्या दाराशी पोचते आणि मागे फिरते.
दुर्ग या कथेतही नायिकेला काय हवं आहे? कळत नाही. काही समाज परीस्थितीच्या आणि कौंटुंबिक अडचणी तर असणारच, तरी तशी प्रतिकूलता नसताना त्या निष्क्रिय आहेत.
दोघींनाही मनातलं बोलू शकू अशा मैत्रिणी आहेत, ही मैत्री कशी होत जाते ते नाही.
दोघीही नव्या पिढीतल्या आहेत. सेक्स ही त्यांच्यासाठी सहज गोष्ट आहे, म्हणजे साधी नाही पण सोबत नैतिकतेचे, जबाबदारीचे प्रश्नही घेऊन येत नाही. ही सहजता धक्का देऊ शकते. वाहून जाण्याच्या प्रत्येक क्षणी त्या जाग्या आहेत.
रण आणि दुर्ग या दोन्ही कथांमधे
कच्छचे रण आणि दुर्ग ही दोन महत्त्वाची पात्रे आहेत. catalyst सारखी! ती नसती तर दोघींनी जे निर्णय घेतले ते कदाचित घेतले नसते. आजवर आपण कथांमधून परीस्थिती कशी घडवते हे बघत आलो पण हे वेगळं आहे. खरं आहे.
बाकी वाचलंच पाहिजे असं काही नाही.
आपल्याला नुसता कथा आणि कादंबर्यामधे रस नसेल आणि लेखक कसा वाढतो, कसकसा विचार करतो यातही रस असेल तर हे पुस्तक वाचा.
रण - दुर्ग -- लेखक मिलिंद बोकील
मौज प्रकाशन गृह
पाने - १७२, किंमत - १६० रू.
No comments:
Post a Comment