Saturday, 4 February 2012

मॉरीबरोबरचे मंगळवार.

सोशिऑलॉजी प्राध्यापक असलेल्या मॉरी श्वार्झ यांना उत्तरायुष्यात ALS या दुर्धर आजाराने घेरलं. एकेक करुन अवयव दगा देणार, आपण परावलंबी होत जाणार आणि एक दिवस (लवकरच) मृत्यु समोर सयंत्र उभा ठाकणार हा या आजाराचा अटळ शेवट त्यांना कळला होताच.

या शेवटच्या प्रवासाचा अभ्यास करायचं त्यांनी ठरवलं, एक विद्यार्थी हाताशी घेतला आणि काम चालू झालं

(त्यांचाच १५~२० वर्षापूर्वीचा विद्यार्थी, मधल्या काळात संपर्क तुटलेला).

वर्ग भरायचा दर मंगळवारी, विषय होता, ’जगण्याचा अर्थ’, शिकवताना अनुभव हा संदर्भ होता.

श्रेणी दिल्या जात नव्हत्या, प्रण प्रत्येक वर्गात तोंडी परीक्षा असायची, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागायची आणि स्वत: प्रश्नही विचारावे लागायचे. प्राध्यापकांना शारीरिक हालचालीत मदत केली तर बरं, त्यांचा पाय उचलून ठेवायचा, त्यांचा घसरलेला चष्मा पुन्हा नीट नाकावर ठेवायचा वगैरे.

पुस्तकांची गरज नव्हतीच, तरीही खूप मुद्दे चर्चिले जायचे. प्रेम, काम, कुटुंब, समाज, वार्धक्य, क्षमा आणि शेवटी, मरण.

शेवटचा वर्ग अगदीच थोड्या वेळेत संपला, काही शब्दच फक्त बोलले गेले.

अंत्यविधी हाच पदवीप्रदान समारंभ होता.

काय शिकलात त्यावर एक प्रबंध लिहिणं मात्र अपेक्षित होतं.

तो प्रबंध म्हणजे
tuesdays with Morrie हे मिच आल्बम या लेखकाचे पुस्तक.

तो विद्यार्थी म्हणजे मिच.

an old man, a young man and life's greatest lesson ही या पुस्तकाची मुखपृष्ठावरची ओळख आहे.

८ वर्षांपूर्वी हे पुस्तक पहिल्यांदा मी वाचलं आणि अस्वस्थ झालो, त्यानंतर कितीतरी वेळा मी हे वाचून काढलं. कल्पनेतही अविश्वसनीय वाटावा असा मॉरी हा माणूस आहे. मरणाची पावलं स्पष्टपणे ऐकू येताहेत हे कळल्यावर मॉरीने ठरवलं की जीवनापासून मृत्युकडे होत असणारी आपली वाटचाल आपण स्वत: अभ्यासायची, इतरांना अभ्यासू द्यायची. कुणी गेल्यावर लोक इतकं छान छान बोलतात पण गेलेल्याला ते काहीच ऐकता येत नाही हे काही बरं नाही असं मॉरीला वाटलं आणि त्याने जिवंतपणीच स्वत:साठी श्रद्‍धांजलीचा कार्यक्रम घडवून आणला.

मधल्या काळात जगण्याच्या कुतरओढीत ऐहिक यशाची नवीनवी ध्येयं गाठण्यात मिच पूर्ण गुरफटून गेलेला होता. अकस्मात एक दिवस टीव्हीवर त्याला मॉरीच्या या अभ्यासप्रकल्पाची बातमी कळते आणि तो आपल्या जुन्या कोचला भेटायला येतो.

इथून पुढे त्यांचे वर्ग चालू होतात, आपल्याला दोघांच्या भूतकाळातल्या काही घटना कळतात, मिचला त्याचा कोच भेटतो, मिचला जुना हरवलेला मिच पुन्हा भेटतो.

हे सगळं अगदी अवश्य मुळातून वाचायला हवं. (सुनंदा अमरापूरकरांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे)

मॉरीच्या शब्दात,

या आजाराबरोबर हळूहळू संपत जात असताना, मला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा धडा शिकायला मिळाला आहे.

The most important thing in life is to learn how to give out love, and how to let it come in.

Love is the only rational act.

Here is how we are different from those wonderful plants and animals..

As long as we can love each other, and remember the feeling of love we had, we can die without ever really going away. All the love you created is still there. All the memories are still there. You live on-in the hearts of everyone you have touched and nurtured while you were here.


Death ends a life, not a relationship.


 

 



 

 

 

टीप

याच ढळत्या दिवसात, अमेरिकन टीव्हीवर मॉरीच्या मुलाखती प्रदर्शित झाल्या, त्या या दुव्यावर पाहायला मिळतील.

http://video.google.com/videoplay?docid=3863455317235235085#

Thursday, 19 January 2012

रण - दुर्ग

रण - दुर्ग

मिलिन्द बोकीलांच्या दोन दीर्घकथा आहेत. कादंबरी असा उल्लेख का केला असावा, कळले नाही.
दोन्ही कथांच्या नायिका एमएसडब्ल्यू करून एनजीओत काम करणार्‍या आहेत.
दोन्ही दीर्घकथा एका पातळीपर्यंत पोचतात, विचार करायला प्रवृत्त करतात, त्यापलीकडे ज्या उंचीवर जातील याची अपेक्षा असते, तिथवर पोचत नाहीत.
रण कथेत नमिताने नागेशला घटस्फोट दिलेला आहे, मुलाला घेऊन एकटी राहते. घटस्फोटानंतर भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले असताना, कच्छच्या रणात दोघे भेटतात.
त्याला वाटतं, घटस्फोटाचं कारण ’तो पूर्वी दारू प्यायचा, सिगरेटी ओढायचा, हे आहे." विचारपूर्वक ते तो बंद करतो. त्याची नमिताबरोबर पुन्हा एकत्र राहण्याची इच्छा आहे. नमिता म्हणते तेच एक महत्त्वाचे कारण नाही, तो तसा छानच आहे, सभ्य , मनमिळाऊ, हसतमुख, पोलिटिकली अगदी करेक्ट, कुणालाही वाटेल काय मस्त माणूस आहे! ... आतून अगदी पोकळ . त्याच्याबरोबर एकत्र राहतो त्या प्रत्येक क्षणीच कळतं ते!"
या बिंदूपासून कथा उतरत जाते. नमिताला काय म्हणायचं आहे ते नीट स्पष्ट होत नाही, ती ते शोधायलाच जात नाही. तिला हा माणूस असा आहे हे कळतं, ती आतल्या आवाजाला ओ देते, गुंते सोडवत नाही. म्हणजे एका गुहेच्या दाराशी पोचते आणि मागे फिरते.
दुर्ग या कथेतही नायिकेला काय हवं आहे? कळत नाही. काही समाज परीस्थितीच्या आणि कौंटुंबिक अडचणी तर असणारच, तरी तशी प्रतिकूलता नसताना त्या निष्क्रिय आहेत.
दोघींनाही मनातलं बोलू शकू अशा मैत्रिणी आहेत, ही मैत्री कशी होत जाते ते नाही.
दोघीही नव्या पिढीतल्या आहेत. सेक्स ही त्यांच्यासाठी सहज गोष्ट आहे, म्हणजे साधी नाही पण सोबत नैतिकतेचे, जबाबदारीचे प्रश्नही घेऊन येत नाही. ही सहजता धक्का देऊ शकते. वाहून जाण्याच्या प्रत्येक क्षणी त्या जाग्या आहेत.
रण आणि दुर्ग या दोन्ही कथांमधे
कच्छचे रण आणि दुर्ग ही दोन महत्त्वाची पात्रे आहेत. catalyst सारखी! ती नसती तर दोघींनी जे निर्णय घेतले ते कदाचित घेतले नसते. आजवर आपण कथांमधून परीस्थिती कशी घडवते हे बघत आलो पण हे वेगळं आहे. खरं आहे.
बाकी वाचलंच पाहिजे असं काही नाही.
आपल्याला नुसता कथा आणि कादंबर्‍यामधे रस नसेल आणि लेखक कसा वाढतो, कसकसा विचार करतो यातही रस असेल तर हे पुस्तक वाचा.


रण - दुर्ग -- लेखक मिलिंद बोकील
मौज प्रकाशन गृह
पाने - १७२, किंमत - १६० रू.