Sunday, 27 June 2010

शुभ्र काही जीवघेणे

शोभा गुर्टु, बेगम अख्तर, सादत हसन मंटो, ओपी नय्यर, सज्जाद हुसेन, पार्श्वनाथ आळतेकर आणि पंकज मलिक या सात कलावंतांच्या आयुष्याचा आणि कलाप्रवासाचा वेध घेणार्‍या लेखांचे हे पुस्तक.
आपल्या कलागुणांनी साहित्य, नाट्य, संगीत अन सिनेमाचा परिसर उजळून काढणारी सात कलंदर व्यक्‍तिमत्वं या पुस्तकाला रेलून उभी आहेत.
प्रतिभेच्या वरदानाने आणि नितांत अस्वास्थ्याने सगळेच भारुन गेलेले, ’शुभ्र काही जीवघेणे’ शोधू पाहणारे सात मनस्वी कलावंत.

अंबरीश मिश्र हे याचे लेखक. सर्वच लेख वेगवेगळ्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले आहेत.

कलावंतांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारे लेखन मराठीत काही नवीन नाही. "गुण गाईन आवडी", "गणगोत" मधून पुलंनी आपल्यापर्यंत पोचवले काही कलंदर. पण अंबरीश मिश्रांची शैली खूप वेगळी आहे.
त्यांची लेखणी अत्यंत उत्कटतेने या सातांच्या जगण्याचा वेध घेते. त्यांच्या कलाप्रवासातील असोशी, सर्जनशीलतेतील प्रमाथीपणा विलक्षण ताकदीने आपल्यावर येउन कोसळतो, आपण अवाक होतो ते या कलावंतांच्या मनस्वी फकिरीमुळे तसेच हे आपल्यासमोर मांडणार्‍या मिश्रांच्या भरजरी तरीही तरल-कोमल भाषेमुळे.

अख्तरीबाईंवरच्या लेखाची सुरुवातच अशी ..
’दुःखाला स्वर देणार्‍या कलावंताला साल्वादॉर दालीने आपला पहिला सलाम सांगितलाय.
माझं पहिलं नमन बेगम अख्तरला आहे, तिच्या प्राणलक्षी सुरांना आहे.
अख्तरीबाईंच्या षड्जात करुणेचा लसलसता कोंभ आहे. आदिम दुःखाचं तेजाब आहे. अन हे तेजाब पचवून टाकण्याची झिंग आहे. ’खालीही सही मेरी तरफ जाम तो आया’ असा फकिरी नशा आहे. अन पुन्हा वर दशांगुळे उरणार्‍या आयुष्याशी जाबसाल करण्याची कलंदरी आहे’

काही शब्दांमध्ये खूप काही पोचवण्याची किमया या पुस्तकात ठिकठिकाणी आहे. पण ही केवळ भाषेची रोषणाई नाही तर वाचक म्हणून आपल्याला ओढून घेतलं जातं त्या प्रपातामध्ये. बेगम अख्तर हे नाव मी पहिल्यांदा वाचलं पुलंमुळे. तो लेख कितीदा वाचूनही त्यांच्या सुरांची ओळख करुन घ्यावी असं केव्हाच वाटलं नाही. अंबरीश मिश्रांची ’अख्तरीबाई’ वाचल्यावर मी तडक ’दीवाना बनाना है तो दिवाना बना दे’ च्या कॅसेटच्या शोधात बाहेर पडलो आणि मिळवलीदेखील. (सुर-स्वरांच्या आस्वादातलं बेसुरेपण मात्र संपलं नाही आणि कॅसेटपेक्षा लेखाचीच अगणित पारायणे झालीत ही कबुली येथे द्यायला हवीच.)

अशा प्रकारच्या कुठल्याही पुस्तकात असतात तसे येथे किस्से, आठवणी, दंतकथा यांचीही भरपूर पेरणी आहे.
ओपी, मंटो यांच्यासारखे विषय असल्यावर तर हे येणारच. हे सारंही खूप सहजतेने (सफाई, स्पष्टीकरणाच्या भानगडीत न पडता) आपल्यापर्यंत येतं.

’ओपी’वरचा लेख हा दोन भागात आहे. सुरुवातीच्या भागात ओपीच्या स्वत:च्या आठवणी आहेत आणि दुसर्‍या भागात ओपी-अंबरीश स्नेहाच्या आठवणी.
ओपीच्या आठवणी या ओळींपाशी संपतात.
’एक मन मला दामटतं-काही आठवू नकोस. वर्तमानात स्वस्थ बैस. दुसरं मन अल्लद भूतकाळात निघून जातं. दोन मनांचा हा झगडा अधूनमधून सुरु असतो. एक हळवं, दुखरं संवेदनशील मन, दुसरं ऐटबाज, रगेल मन. एक मन दुसर्‍या मनाला नेहमी सांगत असतं-- "मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूं.

1 comment:

नीरज पाटकर said...

मस्त लिहीलं आहेस. पुस्तक वाचेन नक्की.