"झिम्मा" हे विजया मेहता यांचं नाट्यविषयक आठवणीचं संकलन आहे किंवा व्यावसायिक चरित्र आहे असं म्हणता येईल.
विजया मेहतांचं आत्मचरित्र म्हणजे त्यातून खूप काही गवसेल अशी अपेक्षा ठेवून पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक तसं चांगलं आहे, एकदा वाचलंच पाहिजे असंही, पण अपेक्षा पुर्या होत नाहीत.
एक संथ निवेदन, थोड्या चढ उतारांसकट सुरू आहे...... आपण उत्कर्षबिंदूच्या प्रतिक्षेत, तो येतच नाही.
काळाचा एक मोठा पट आपल्यासमोर उलगडत जातो. पाच वर्षांची बेबी.... विजया.... विजया जयवंत... बाई... विजया खोटे... विजया मेहता.
कुटूंबातली धाकटी बेबी, तिचं आणि बायजीचं नातं, मग विजया तिचं आजूबाजूच्या जगाकडे पाहणं, विजया जयवंत म्हणून नाटकांत प्रवेश, जाणीवपूर्वक चित्रपटांची वाट नाकारणं,साहित्य संघ..., अलेक पदमसी, अदी मर्झबान या गुरूंकडून शिकणं, रंगायनची सुरूवात ...... हरीन खोटेंशी लग्न, त्या आधीपासूनच दुर्गाबाई खोट्यांशी जवळीक, शिष्यत्व, मधेच जमशेदपूर, तिथे काही जमवाजमव, मुंबईत परत, रंगायन जोमाने, एकीकडे रंगायनची नाटकं, दुसरीकडे पुलंच्या नाटकात कामे असं सुरू. मग फरोख मेहतांशी लग्न, इंग्लंडमधे तीन वर्षे वास्तव्य, तिथल्या रंगभूमीची ओळख करून घेणं, कार्यशाळा ...., तिथल्या रंगभूमीवरची नाटकं पाहणं, रंगायनवर अखेरचा पडदा, व्यावसायिक नाटकांमधे भूमिका आणि दिग्दर्शन, जर्मन रंगभूमीवर काही नाटके, एन. एस. डी. चं अध्यक्षपद, एन.सी.पी.ए. ची संचालक म्हणून काम .......... असं भरगच्च आयुष्य आहे.
सुरूवातीलाच त्यांनी म्हंटलंय नाट्यकलेमधून उभे राहणारे काही असामान्य क्षण, ’द मॅजिक ऑफ थियेटर’ चा शोध घ्यावा हा लिखाणाचा हेतु आहे.
तसे काही क्षण उभे करायचा त्यांनी प्रयत्न केला आहे, पीटर ब्रूक च्या महाभारताचं वर्णन किंवा इडिपसचं वर्णन... नागमंडल ची सुरूवात..... ते त्रोटक झालं आहे अजून हवं होतं. बॉडी इमेज सापडण्याचे क्षण चांगले रंगवले आहेत. शितू किंवा नानी किंवा मावशीबाई..... लोकमान्य (त्यांचाच शब्द) रंगभूमीवर त्यांनी दिग्दर्शित आणि अभिनीत केलेल्या नाटकांविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. रेनेसांचा काळ मस्त उभा केला आहे.
त्या मानानं रंगायनच्या नाटकांविषयी फारसं लिहिलेलं नाही.
जर्मनीत नेलेल्या नाटकांविषयीही विस्ताराने आलं आहे तरीही सर्वकाही सांगितलंय असं झालेलं नाही.
बाईंचा आवाका खूप मोठा आहे त्यामानाने वाचकाच्या पदरात पडत नाही.
बाईंनी त्यांची नाटकं वगळता इतर समकालीन नाटकांविषयी, दिग्दर्शकांविषयी, त्यांच्या शैली विषयी काहीही लिहिलेलं नाही. तेंडूलकर, एलकुंचवार असोत की दळवी असोत, त्यांच्या इतर कामांविषयी काहीच नाही. भवताल उभा करून त्यात विजयाबाईंची नाटकं, असं झालेलं नाही. वाचकांना केवळ बाईंचा नाट्यप्रवास एवढाच दिसतो. अजब न्याय वर्तुळाचा असेल किंवा मुद्राराक्षस, शांकुतल, हयवदन असेल जर्मनीत नाटक नेणं , करणं यामागचे कष्ट दिसतात पण त्यांचं स्थान, महत्त्व? ते पुरेसं स्पष्ट होत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीसे असे प्रोजेक्ट होत असणार? बाईंचं मोठेपण पुरेसं पोचत नाही.
विजयाबाईंची नाट्यकलेवरची मतंही ठोसपणे येत नाहीत. भावविवशता आणि भावनोद्रेक यांवर एक चांगलं टिपण आहे. बॉडी इमेज शोधण्यावर आहे, स्तालिनावस्कीचे उल्लेख येतात, पीटर ब्रूक काय म्हणतो येतं, भूमिकेची लय, ताल यावर आहे, नटांच्या एकपात्री अभिनयाबद्दल आहे, पण तरीही विजयाबाईंकडून अजून हवं होतं.
बाईंचे धारदार आग्रह पुढे येत नाहीत, झालेले वाद नाहीत.
वैयक्तीक आयुष्यातलंही बाई मोकळेपणानं सांगत नाहीत. हरीन का आवडला? फरोखमधे काय गवसलं? काहीच नाही, बायजी, दुर्गाबाई आणि बापाईजीबद्दल त्या कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांच्यामुळेच मला जमलं वगैरे पण बापाईजीबरोबरचा एकही प्रसंग नाही.
बहुतेकदा विजयाबाई स्वत:च मत व्यक्त करतात, वाचकाला ते बनवू देत नाहीत. पीटर ब्रूक बाईंना गुरूसमान आहेत, तर का बुवा?
नाटकांतील पात्रांच्या मनात उतरणार्या बाई स्वत:च्या मनात उतरत नाहीत. तिथले कल्लॊळ वाचकाला कळत नाहीत. या विजयाबाईंनी वाचकांशी स्टेजवर मारलेल्या गप्पा आहेत. विश्वासात घेऊन माजघरात मारलेल्य़ा गप्पा नाहीत.
याची बाईंनांही बहुदा कल्पना आहे. त्या म्हणतात, " लिखाणासाठी मनाच्या खोल भुयारात शिरावं लागतं. एकांतांत स्वत:भोवती घिरट्या घालणं गरजेचं होऊन बसतं. अन मला तर माझ्या सहवासाचा मनस्वी कंटाळा येतो. माझ्याजवळ फक्त मीच असले की मी पार बुजते. मला सतत कुणीतरी सोबतीला लागतं...." यामुळे वाचकाला हातचं राखून सांगितलंय हे कळत जातं.
डोक्यावर वह्या , फायली ठेवून, फुटपाथच्या कडेवरून अन टाचा उंचावून, दोन्ही हात पंखासारखे पसरून , चालणारी विजू...... हरवून जाते, सापडतच नाही, वाचकाला याची हुरहुर वाटत राहते.
तरीही मी शिफारस करीन की हे पुस्तक वाचाच. यातून जे मिळतं तेही खूप आहे. एकदा वाचायलाच हवं.
झिम्मा - आठवणींचा गॊफ
लेखिका -- विजया मेहता,
राजहंस प्रकाशन
पाने - ४४० , किंमत - ३७५ रूपये.
विजया मेहतांचं आत्मचरित्र म्हणजे त्यातून खूप काही गवसेल अशी अपेक्षा ठेवून पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक तसं चांगलं आहे, एकदा वाचलंच पाहिजे असंही, पण अपेक्षा पुर्या होत नाहीत.
एक संथ निवेदन, थोड्या चढ उतारांसकट सुरू आहे...... आपण उत्कर्षबिंदूच्या प्रतिक्षेत, तो येतच नाही.
काळाचा एक मोठा पट आपल्यासमोर उलगडत जातो. पाच वर्षांची बेबी.... विजया.... विजया जयवंत... बाई... विजया खोटे... विजया मेहता.
कुटूंबातली धाकटी बेबी, तिचं आणि बायजीचं नातं, मग विजया तिचं आजूबाजूच्या जगाकडे पाहणं, विजया जयवंत म्हणून नाटकांत प्रवेश, जाणीवपूर्वक चित्रपटांची वाट नाकारणं,साहित्य संघ..., अलेक पदमसी, अदी मर्झबान या गुरूंकडून शिकणं, रंगायनची सुरूवात ...... हरीन खोटेंशी लग्न, त्या आधीपासूनच दुर्गाबाई खोट्यांशी जवळीक, शिष्यत्व, मधेच जमशेदपूर, तिथे काही जमवाजमव, मुंबईत परत, रंगायन जोमाने, एकीकडे रंगायनची नाटकं, दुसरीकडे पुलंच्या नाटकात कामे असं सुरू. मग फरोख मेहतांशी लग्न, इंग्लंडमधे तीन वर्षे वास्तव्य, तिथल्या रंगभूमीची ओळख करून घेणं, कार्यशाळा ...., तिथल्या रंगभूमीवरची नाटकं पाहणं, रंगायनवर अखेरचा पडदा, व्यावसायिक नाटकांमधे भूमिका आणि दिग्दर्शन, जर्मन रंगभूमीवर काही नाटके, एन. एस. डी. चं अध्यक्षपद, एन.सी.पी.ए. ची संचालक म्हणून काम .......... असं भरगच्च आयुष्य आहे.
सुरूवातीलाच त्यांनी म्हंटलंय नाट्यकलेमधून उभे राहणारे काही असामान्य क्षण, ’द मॅजिक ऑफ थियेटर’ चा शोध घ्यावा हा लिखाणाचा हेतु आहे.
तसे काही क्षण उभे करायचा त्यांनी प्रयत्न केला आहे, पीटर ब्रूक च्या महाभारताचं वर्णन किंवा इडिपसचं वर्णन... नागमंडल ची सुरूवात..... ते त्रोटक झालं आहे अजून हवं होतं. बॉडी इमेज सापडण्याचे क्षण चांगले रंगवले आहेत. शितू किंवा नानी किंवा मावशीबाई..... लोकमान्य (त्यांचाच शब्द) रंगभूमीवर त्यांनी दिग्दर्शित आणि अभिनीत केलेल्या नाटकांविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. रेनेसांचा काळ मस्त उभा केला आहे.
त्या मानानं रंगायनच्या नाटकांविषयी फारसं लिहिलेलं नाही.
जर्मनीत नेलेल्या नाटकांविषयीही विस्ताराने आलं आहे तरीही सर्वकाही सांगितलंय असं झालेलं नाही.
बाईंचा आवाका खूप मोठा आहे त्यामानाने वाचकाच्या पदरात पडत नाही.
बाईंनी त्यांची नाटकं वगळता इतर समकालीन नाटकांविषयी, दिग्दर्शकांविषयी, त्यांच्या शैली विषयी काहीही लिहिलेलं नाही. तेंडूलकर, एलकुंचवार असोत की दळवी असोत, त्यांच्या इतर कामांविषयी काहीच नाही. भवताल उभा करून त्यात विजयाबाईंची नाटकं, असं झालेलं नाही. वाचकांना केवळ बाईंचा नाट्यप्रवास एवढाच दिसतो. अजब न्याय वर्तुळाचा असेल किंवा मुद्राराक्षस, शांकुतल, हयवदन असेल जर्मनीत नाटक नेणं , करणं यामागचे कष्ट दिसतात पण त्यांचं स्थान, महत्त्व? ते पुरेसं स्पष्ट होत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीसे असे प्रोजेक्ट होत असणार? बाईंचं मोठेपण पुरेसं पोचत नाही.
विजयाबाईंची नाट्यकलेवरची मतंही ठोसपणे येत नाहीत. भावविवशता आणि भावनोद्रेक यांवर एक चांगलं टिपण आहे. बॉडी इमेज शोधण्यावर आहे, स्तालिनावस्कीचे उल्लेख येतात, पीटर ब्रूक काय म्हणतो येतं, भूमिकेची लय, ताल यावर आहे, नटांच्या एकपात्री अभिनयाबद्दल आहे, पण तरीही विजयाबाईंकडून अजून हवं होतं.
बाईंचे धारदार आग्रह पुढे येत नाहीत, झालेले वाद नाहीत.
वैयक्तीक आयुष्यातलंही बाई मोकळेपणानं सांगत नाहीत. हरीन का आवडला? फरोखमधे काय गवसलं? काहीच नाही, बायजी, दुर्गाबाई आणि बापाईजीबद्दल त्या कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांच्यामुळेच मला जमलं वगैरे पण बापाईजीबरोबरचा एकही प्रसंग नाही.
बहुतेकदा विजयाबाई स्वत:च मत व्यक्त करतात, वाचकाला ते बनवू देत नाहीत. पीटर ब्रूक बाईंना गुरूसमान आहेत, तर का बुवा?
नाटकांतील पात्रांच्या मनात उतरणार्या बाई स्वत:च्या मनात उतरत नाहीत. तिथले कल्लॊळ वाचकाला कळत नाहीत. या विजयाबाईंनी वाचकांशी स्टेजवर मारलेल्या गप्पा आहेत. विश्वासात घेऊन माजघरात मारलेल्य़ा गप्पा नाहीत.
याची बाईंनांही बहुदा कल्पना आहे. त्या म्हणतात, " लिखाणासाठी मनाच्या खोल भुयारात शिरावं लागतं. एकांतांत स्वत:भोवती घिरट्या घालणं गरजेचं होऊन बसतं. अन मला तर माझ्या सहवासाचा मनस्वी कंटाळा येतो. माझ्याजवळ फक्त मीच असले की मी पार बुजते. मला सतत कुणीतरी सोबतीला लागतं...." यामुळे वाचकाला हातचं राखून सांगितलंय हे कळत जातं.
डोक्यावर वह्या , फायली ठेवून, फुटपाथच्या कडेवरून अन टाचा उंचावून, दोन्ही हात पंखासारखे पसरून , चालणारी विजू...... हरवून जाते, सापडतच नाही, वाचकाला याची हुरहुर वाटत राहते.
तरीही मी शिफारस करीन की हे पुस्तक वाचाच. यातून जे मिळतं तेही खूप आहे. एकदा वाचायलाच हवं.
झिम्मा - आठवणींचा गॊफ
लेखिका -- विजया मेहता,
राजहंस प्रकाशन
पाने - ४४० , किंमत - ३७५ रूपये.